मुंबई : ओडिशा येथे झालेल्या फणी वादळाच्या तीव्रतेमुळे असंख्य जणांनी आपली घरे व दैनंदिन रोजगार गमावला. वादळाच्या तडाख्यामुळे बेघर झालेल्या लोकांना आधार व पाठिंबा देण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांनी मदतकार्य व पुनर्वसनाचे नियोजन केले आहे. त्यांच्या वतीने वादळग्रस्तांना अन्न व अन्य वस्तूंच्या रूपात मदत केली जाणार आहे.
वादळामुळे आलेले संकट विचारात घेता फिनोलेक्स बाधित कुटुंबांना दररोज जेवण व पिण्याचे पाणी, तसेच अन्य आवश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम प्रामुख्याने पुरी, खुर्गा व कटक येथील बाधित ठिकाणी राबवला जाणार आहे.
या विषयी बोलताना ‘मुकुल माधव’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, ‘ओडिशातील वादळाच्या निमित्ताने, गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करण्याची माणुसकीची भावना दिसून आली. भारतात गेल्या २० वर्षांतील हे सर्वांत विध्वंसक चक्रिवादळ होते, तरी सरकारने वादळापासून कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी पावले उचलली होती. वादळाचा तडाखा बसलेल्या व मदतीची गरज असलेल्या लोकांना शक्य तितकी मदत करण्याचा ठाम निर्णय कंपनीने एकमताने घेतला आहे. ‘फिनोलेक्स’ची मूलभूत विचारसरणी समाजाचे कल्याण करण्यावर आधारित राहिली आहे आणि अशा संकटांप्रमाणे गरजेच्या वेळी बाधितांचा त्रास कमी करण्यासाठी पुढाकार घेणे व पाठिंबा देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.’